Friday 28 February 2014

सेंद्रिय शेती

शेतीच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी शेतकरी रासायनिक खतांचा वापर मोठया प्रमाणावर करताना दिसून येतात. परंतु काही पिकांची उत्पादनवाढ तात्पुरत्या स्वरुपाची किंवा काही काळासाठीच असते. याचे कारण असे की, आपण उत्पादनवाढीसाठी पिकाला रासायनिक खतांची गरजेपेक्षा अधिक मात्रा देतो. परिणामी जर रासायनिक खतांना अधिक व सातत्याने वापर केल्यामुळे जमिनीचा पोत बिघडतो. परिणामी जमिनीची उत्पादनक्षमता कमी होते. खतांचा वापर अधिक करावयाचा झाल्यास पिकांना पाणीही मोठयाप्रमाणावर द्यावे लागते. त्यामुळे साहजिकच क्षारांचे प्रमाण वाढते; जमिनी खार वाटतात.
कीटक नाशकांप्रमानेच औषधांचा अधिकाधिक वापर करण्याकडे शेतकऱ्यांना ओढा असलेला दिसून येतो. भाजीपाला, फळे, कापूस इत्यादी पिकांना किडींचा उपद्रव होऊ नये म्हणून कीटकनाशके वापरली जातात. ही कीटकनाशके विषारी तर असतात.त्यामुळे उपद्रवकारक कीटक मरतात. त्याचप्रमाणे काही उपक्रम जीवजंतू ही बळी जातात. निसर्गातील काही जीवाणू वा कीटक शेतीसाठी अतिशय उपयुक्त असतात. गांडुळासारख्या जीवाणूस तर शेतकऱ्यांचा मित्रच म्हटले जाते. अशा जिवाणूंना अशा कीटकनाशकामुळे अपाय पोहचतो.  
आज शेतीमध्ये रासायनिक खते, कीटकनाशके व तृणनाशके इत्यादींचा वापर कमी करून अन्नधान्याचा दर्जा व अन्न सुरक्षा वाढविणे आणि त्याच वेळी उत्पादन खर्चही कमी करणे. अशा दुहेरी दृष्टिकोनातून सेंद्रीय शेतीला उत्तेजन देण्यामध्ये पुढाकार घेतलेला दिसून येतो.
महाराष्ट्र राज्यामध्ये सेंद्रीय शेतीला उत्तेजन देण्यासाठी १०० टक्के केंद्र राज्यपुरस्कृत ‘वसंतराव नाईक शेती स्वावलंबन योजना’ राबविली जात आहे. 

सेंद्रीय शेती संकल्पनेतील महत्वाच्या बाबी  
·सेंद्रीयपदार्थांचा खतांद्वारे वापर. 
·जीवाणू संवर्धकांचा वापर
· हिरवळीच्या खतांचा उपयोग. 
· गांडूळ शेती किंवा गांडूळ 
  खताचा वापर. 
· कीड व्यवस्थापन. 
· आच्छादनांचा योग्य वापर. 
· रॉक फॉस्फेट व जिप्सम यांसारख्या खनिजांचा शेतीत वापर.
· पिकांच्या अवशेषांचा व अन्न प्रक्रियेतील टाकाऊ घटकांचा तसेच ओल्या कचऱ्याचा कंपोस्ट करून वापर. 
· पिक फेरपालट व आंतर पिकपध्दतीचा उपयोग



शेतीसाठी वापरली जाणारी आधुनिक अवजारे

शेतीची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी उत्तम प्रतिच्या जमिनीची, तसेच योग्य प्रमाणात पाणी आणि खतांची गरज असते. पण याबरोबरच शेतीमध्ये योग्य प्रकारची कृषी अवजारे आणि कृषि साधांनाचा वापर केल्यामुळे शेतीची कामे कमी खर्चात होतात आणि उत्पादनात वाढ ही होते.

 

भुईमूग शेंगा काढणी यंत्र:
भुईमुगाचे पीक काढण्यासाठी शेतकरी कोग्या कुळवाचा वापर करतात. कुळवाच्या सहाय्याने शेंगांसहित जमिनीतून वेल देखील निघून येतात. नंतर शेंगा तोडून हातांनी वेगळ्या केल्या जातात. हे यंत्र चालविण्यासाठी दोन बैलांची गरज असते. चालविणाऱ्या माणसाला बसण्यासाठी यंत्रावर बैठकीची व्यवस्था केलेली असते. त्यामुळे यंत्र चालविणाऱ्या माणसाला येणारा थकवा सहजासहजी टाळता येतो.या यंत्राच्या साहाय्याने भुईमूग काढणीचा वेगही जास्त वाढतोभुईमुगाप्रमाणेच रताळी, बीट, बटाटे इ. जी जमिनीत वाढतात अशा पिकांच्या काढणीसाठी विशिष्ट प्रकारची काढणी यंत्र देखील उपलब्ध आहेत.

भात व गहू कापणीचे यंत्र :
गहू सोंगणी यंत्रामुळे एक एकर क्षेत्रातील पीक कापून दोन तासांत एकसारखी कापणी करता येते. आणि एका सरळ रांगेत कडपी पडते. या यंत्रा मुळे धान्याची गळ होत नाही. जमिनीतून ते उपटूनही येत नाही. धान्यात माती मिसळत नाही. तसेच वेळेवर सोंगणी झाल्याने पीक नैसर्गिक आपत्तीतून वाचवता येते. भात काढणी यंत्रामुळे एक तासात 15 ते 20 पोते भात निघतो. यंत्राच्या आतील भागात झोडणी झाल्याने तणसही आतल्या आत मळले जाते. त्यातील खाक वेगळी होत असल्याने जनावरांना उत्कृष्ट चारा मिळतो. तणसात भाताचा एकही दाणा वाया जात नाही. तणसाचे बारीक तुकडे होत नाहीत.
वैभव विळा: याच्या मदतीने जमिनीलगत भात कापणी करता येते त्यामुळे खोडकिडीच्या अळ्यांचा नाश होतो.

ट्रॅक्टरचलित बहुपीक टोकण यंत्र
कमीत कमी 35 अश्‍वशक्तीवर चालणाऱ्या या य़ंत्राच्या मदतीने आठ तासांत तीन ते साडेतीन हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी करता येते
 या यंत्रात 22.5 सें.मी. अंतरावरील पिकासाठी नऊ ओळी, 30 सें.मी. अंतरावरील पिकांसाठी सात ओळी व 45 सें.मी. अंतरावरील पिकांसाठी पाच ओळी एकाच वेळेस पेरता येतात. तसेच यंत्राच्या सहाय्याने दररोज १० ते १२ एकर क्षेत्रात तृणधान्ये व कडधान्ये याचे टोकण करणे तसेच खते फुले देण्याचे काम करणे सोपे जाते.




माती परीक्षण का व कशासाठी?



ज्या जमिनीमध्ये आपण पिके घेतो. त्या जमिनीचा प्रकार कोणता त्या जमिनीत कोणती अन्नद्रव्ये किती प्रमाणात आहेत, या सगळ्यांची माहिती करून घ्यायची असेल तर किमान वर्षातून एकदा तरी माती परीक्षण करणे गरजेचे आहे. त्यानुळे आपल्याला जमिनीची सुपीकता उत्पादकता किती आहे कोणती अन्नद्रव्य (रासायनिक/ सेंद्रियपदार्थ) किती प्रमाणात घालावे याची माहिती माती परीक्षणामुळे होते. आपल्या भारताची लोकसंख्या १२५ कोटीच्या आसपास आहे. या वाढत्या लोकासंखेमुळे अन्नधान्याची समस्या भेडसावत आहे. अशा वेळी परंपरागत चालत आलेल्या शेती करण्याच्या पद्धतीला आज आळा घालून आधुनिक शेती पद्धतीचा अवलंब केला पाहिजे. त्यामध्ये संकरीत बियाणांचा वापर, कीटक औषधांचा वापर, संजीवकांचा वापर संरक्षित पाण्याचा वापर, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आधुनिक सुधारित अवजारांचा वापर यांचा समावेश होतो. त्यामुळे अन्नधान्याच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झालेली दिसून येते. सध्या आपण बघतो की असलेल्या जमिनीमधून एकाच पिक घेतल्याने त्यामधील अन्नद्रव्यांचा ऱ्हास होत चालला आहे. जमिनीची जडण-घडण बिघडत चालली हे. हवा पाणी घेण्याचे प्रमाण कमी झाले आहे. जमिनीची पाणी धारण क्षमता कमी झाली आहे. त्याचप्रमाणे खतांचा असंतुलित   अमर्याद वापरामुळे जमिनीत जे कार्यक्षम जीव-जंतू आहेत, त्यांची संख्या कार्यशक्ती कमी झालेली दिसून येते. एकंदरीत सगळी परिस्थिती लक्षात घेता जमिनीचे स्वास्थ्य बिघडत चालले आहे. त्यामुळे जमिनीची सुपीकता उत्पादकता कमी झाली. आणि म्हणूनच शेतकऱ्यांचे उत्पादन कमी झाल्याचे आढळते.
   पिकांच्या वाढीसाठी एकूण १६ अन्नद्रव्यांची गरज असते. त्यापैकी कर्ब, हायड्रोजन, ऑक्सिजन हे वनस्पतीला हवा पाणी यांच्या माध्यमातून तर उरलेली १३ मूलद्रव्ये  जसे नत्र, स्फुरद पालाश हे मुख्य मूलद्रव्ये पिकासाठी महत्वाचे ठरतात. तसेच कॅल्शियम, मॅग्नेशियम,गंधक ही मध्यम प्रमाणात लागतात. तर उरलेले जस्त, बोरॉन, मॉलिब्लेडम, क्लोरीन, लोह, मॅगनीज तांबे ही सात सूक्ष्म अन्नद्रव्ये वनस्पतींना फार कमी प्रमाणात लागतात ही सगळी १३ मूलद्रव्ये  वनस्पतींना जमिनीतून उपलब्ध होतात.. ही अन्नद्रव्या वनस्पतीच्या शोषणामुळे कमी अधिक प्रमाणात होत असतात .यामुळे जमिनीमध्ये रासायनिक सेंद्रिय खतांचा ( शेणखत, काम्पोस्त खत, पेंड खत हिरवळीचे खत ) वापर करून त्याची कमतरता भरून काढली जाते आणि म्हणूनच पिकांना लागणाऱ्या उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण जमिनीत किती आहे म्हणजेच जमिनीची सुपीकता पाहण्यासाठी किंवा जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण तपासण्यासाठी माती परीक्षण करणे गरजेचे आहे आणि त्यानुसारच पिकांच्या वाढीच्या गरजेनुसार खतांचे नियोजन करण फायद्याचे ठरते.
मातीपारीक्षानाचे उद्देश
 
माती परीक्षणामुळे जमिनीची सुपीकता ओळखता येते. म्हणजेच जमिनीचा सामू (पी.एच) विद्राव्य क्षार, सेंद्रिय कर्ब, उपलब्ध नत्र, स्फुरद, पालाश यांचे प्रामुख्याने परीक्षण केले जाते.त्यावरून समजते कि, जमिनीत कोणत्या अन्नद्रव्यांची कमतरता आहे जमीन पिक वाढण्यासाठी योग्य आहे किंवा नाही हे समजते. याशिवाय विद्राव्य क्षारांवरून जमिनीची प्रत समजते. मातीतील चुनखडीचेही प्रमाण मिळते. खराब जमिनीमधील सूक्ष्म अन्नद्रव्यांची तपासणी आवश्यकतेप्रमाणे करण्यात येते. तसेच जैविक सृष्टीचे प्रमाणही पहिले जाते. या माहितीवरून समजते कि पिक वाढीसाठी कशाची कमतरता आहे ती भरून काढण्यासाठी काय करणे आवश्यक आहे हे ठरविता येते. हाच माती परिक्षनाचा प्रमुख उद्देश आहे. माती परीक्षण पिक उत्पादन यांचे संबंधावरून पिकांना जमिनीतून किती प्रमाणात अन्नद्रव्य मिळतात खतातून किती प्रमाणात अन्नद्रव्ये देणे गरजेचे आहे याचा अंदाज शेतकऱ्याला येतो.
 आजच्या काळात प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या जमिनीचे माती परीक्षण करणे गरजेचे आहे. माती परीक्षणाचा फायदा नक्कीच शेतकऱ्यांना  होईलच. आणि दर हेक्टरी उत्पन्नातही वाढ दिसून येईल.